बाप घर के दरख़्त होते हैं..

- दिवस आहे की रात्र आहे की काय आहेय आत्ता?

दिवस-रात्री-प्रहरांचे हिशेब नष्ट होऊन गेले आहेत मेंदूमधून.

काही आवाज येतायत. कुणी धडपडल्याचे, कुणी दटावत असल्याचे. कुणी शिव्याही देत आहे का? माझे डोळे उघडता उघडता नाहीयत. दोन रात्री आणि दोन दिवस आणि पुन्हा ही आताची अर्धी रात्र असा जवळजवळ पन्नाससाठ तास मी नीट झोपलेलो नाही. आत्ता हे आवाज येतायत तर ते फार अस्पष्टपणे मेंदूपर्यंत पोहचतायत, जवळपास काहीतरी घडतं आहे, असं फार धूसरधूसर जाणवतं आहे, आटोकाट प्रयत्न करून मी माझे डोळे ताणून उघडायचा प्रयत्न करतो, पण डोळ्यांतून, मस्तकातून जणू गरम वाफारे ओसंडत आहेत, पराकाष्ठा करूनही देहामनामेंदूमध्ये भिनलेला थकवा झोपल्या जागेवरून उठू देत नाही. मी दमलो आहे अतिशय. जणू छातीवर, डोळ्यांच्या पापण्यांवर अपरिमित जडशीळ ओझं लादलं आहे. आटोकाट प्रयत्न करूनही पापण्या वर उचलल्याच जात नाहीयेत.

निद्रा-जागृतीच्या ऐलपैल झगड्यात शेवटी झोप माझ्यावर मात करते. कानांवर आदळणारे धडपडण्याचे, दटावण्याचे, ओरडण्याचे सगळे आवाज झुगारून देऊन मी पुन्हा कधी झोपी जातो, मला अजिबात कळत नाही.

प्रचंड दमून रात्री बाराएक वाजता गाडीत येऊन सीट मागे कलतं करून मी झोपी गेलो, त्यावर नंतर किती वेळ गेला आहे मध्ये? आत्ता मध्यरात्र आहे की दिवस उगवलाय पुढचा?

पुन्हा आवाज वाढला आहे. पुन्हा कुणीतरी धडपडत, ओरडून चिडून बोलत आहे.

अण्णांचा आवाज आहे का हा?

अण्णा!

‘अण्णा’ हा शब्द मनात आल्याबरोब्बर मी खाडकन डोळे उघडले.

हाताने चाचपून बटन दाबलं आणि कारच्या खिडकीची काच खाली सरकवली. बाहेरचे आवाज एकदम ठळक ठसठशीत झाले.

अण्णांचा आहे हा आवाज!

मी धाडकन गाडीचा दरवाजा उघडला आणि बाहेर आलो. भराभरा चालत दहाच पावलांवर असलेलं कोविड वार्ड नंबर पाचच्या आवाराचं फाटक ढकलून आवारात गेलो.

तिथे तीनचार जणांनी चौफेर घेरलेले अण्णा कडाक्याच्या थंडीत वार्डच्या अंगणातल्या सिमेंटच्या भुईवर हटून बसलेले आहेत. त्यांना घेरलेल्या चार जणांमध्ये दोन ‘ब्रदर’ आहेत, दोन वार्डबॉय. ते अण्णांना उठवायचा प्रयत्न करत आहेत आणि आणि अण्णा भडकून शिव्या घालत आहेत.

दोन नोव्हेंबर दोन हजार एकवीसची ही काळोखी पहाट आहे. प्रचंड कडाक्याची थंडी मातली आहे भोवतालात, आणि अण्णांच्या अंगावर फक्त बनियन आणि खाली आतली अर्धी चड्डी आहे. चड्डीतून बाहेर आलेली लघवीची नळी आणि लघवी साठवायची बॅग त्यांच्या बाजूला पडली आहे. मनगटातून आलेली आणखी एक नळी आणि तिच्या दुस-या टोकाला सलाईनची बाटलीही आहे, ती त्यांच्या पुढ्यात पडलेली आहे. तसल्या हाडं गोठवणा-या गारठ्यात अण्णा भुईवर हात टेकून रेटून उघड्यावर बसले आहेत आणि दवाखान्याचा उपरोल्लेखित स्टाफ त्यांच्याभोवती निव्वळ कर्तव्यबुद्धीने उभा आहे. या सरकारी दवाखान्याच्या स्टाफला पेशंटबद्दल आस्था, प्रेम, काळजी वाटण्याचं काहीएक कारण नाही, हे मी परवापासून बघतच आलेलो आहे.  

स्टाफचं कोंडाळं भेदून मी धावत अण्णांच्या जवळ गेलो, त्यांच्या दंडाला धरून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत म्हणालो, अण्णा, तुम्ही बाहेर कशाला आलात? उठा, आत चला.

अण्णांचा दंड सणसणून तापलेला आहे. प्रचंड ताप भरलेला आहे त्यांना. तापेने, थंडीने आणि संतापाने त्यांचा शिडशिडीत देह लटालटा कापत आहे. माझा आवाज कानावर पडल्यावर मी दंड धरलेला हात हिसकावून मोकळा करण्याचा प्रयत्न करत त्यांनी माझ्याकडे त्वेषाने पाहिलं. रसरसत्या निखा-यासारख्या फुललेली त्यांची ती विस्तवी नजर मला जन्मात विसरता येणार नाही.

“भडव्या, कुठं आई घालायला गेला होतास तू? हे कोण लोक माझ्या घरात शिरलेत बघ. आधी त्यांना बाहेर काढ..”

“कुणी घरात आलेलं नाही अण्णा. आपण दवाखान्यात आहोत. तुम्हाला भास झाला काहीतरी. तुम्ही आत चला आणि झोपा. रात्र आहे अजून. मी आहे इथेच.”’ लहान हट्टी मुलाची समजूत घालावी, तसा प्रयत्न करत मी म्हणालो आणि त्यांच्या पाठीमागून दोन्ही काखेत हात घालून त्यांना उचलायचा प्रयत्न केला. यावेळी वार्डबॉयही  मदतीला आले. इथेतिथे धरून आम्ही तिघाचौघांनी त्यांना उचलून वार्डच्या दिशेने घेऊन गेलो.

एक जोरकस उसळी घेऊन सुटायचा प्रयत्न करत आणि ब्रदर-वार्डबॉईजकडे हात दाखवत अण्णा कडाडले, “कुणी आलं नाही? हे.. हे.. हे कोण आहेत मग? आधी यांना बाहेर काढ तू भाडखाव..”

-0-

- हा कोविड-19 वार्ड नंबर पाच आहे. अवाढव्य पसरलेलं हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. इथे नेलेला माणूस मरूनच माघारी येतो, अशी माझ्या लहानपणी या दवाखान्याची ख्याती होती. आमच्या भागात याला ‘वरचा दवाखाना’ असंच म्हणतात. वरचा म्हणजे गावाबाहेर गावापेक्षा जराशा उंच टेकडीवर वसलेला, किंवा थेट ‘वर’ पाठवणारा असं काहीही तुम्ही म्हणू शकता. माझ्या लहानपणी हा दुसरा अर्थ जास्त प्रचलित होता. आता, दरम्यानच्या पंचवीस-तीस वर्षांच्या काळात हा दुसरा अर्थ विरून गेलेला आहे. आता हा दवाखाना लोकप्रिय आहे. आजारी माणसांना इथे घेऊन येताना आता कुणी घाबरत नाही. सकाळी दहा-बाराच्या दरम्यान इथल्या बाह्य-रुग्ण विभागात आमच्या गावातल्या आठवडी बाजाराइतकी गच्च गजबज असते.

एकोणतीस ऑक्टोबरला सकाळी आईचा फोन आला गावाकडून. म्हणाली, तीनचार दिवसापासून तुझ्या वडलाचं लई दुखायलंय. ताप-खोकला आलाय. दवाखान्यात जायला राजी नाहीत. मलाही तापेचा त्रास व्हायलाय, पण मलाही दवाखान्यात जाऊ देईनात. कसं करू मी?

मी वैतागलो. अण्णांचं हे नवं नाही. आपलं काही दुखतंय खुपतंय तर आपण दवाखान्यात जावं, इतकी साधी गोष्ट हा माणूस का करत नाही? मागे एकदोन वेळा काहीतरी असल्याच आजाराच्या वेळी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हायचं साफ नाकारून तडातडा चालत अण्णा दवाखान्यातून घरी आले होते. ‘खाजगी दवाखान्यात डॉक्टर निव्वळ लुबाडतात’ असे अनुभव काहीवेळा आल्यामुळे खाजगी हॉस्पिटल्सवरचा त्यांचा विश्वास साफ उडून गेला होता, ते ठीकच होतं. पण सरकारी दवाखान्यात काही खर्च नसतो. गरज नसली तरी पेशंटला मरण्याचा धाक घालून फलाणी टेस्ट कर, बिस्तानी टेस्ट कर, स्पेशल वार्डात अॅडमिट करून बेडचं रोजचं अव्वाच्या सव्वा भाडं वसूल कर, असले प्रकार सरकारी दवाखान्यात कुणी करत नाही. अण्णांनी निदान गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घायला काय हरकत होती?

कारणाकारणांनी अण्णांना हे अनेकदा सांगून झालेलं आहे.

अण्णा ऐकणा-यातले नाहीत.

आयुष्यभर त्यांनी कुणाचंच काहीही ऐकलेलं नाही. चुकीचं असेल, किंवा बरोबर असेल; अण्णा विलक्षण रगदारपणे जगले.

अतिशय दारिद्र्यातून त्यांनी त्यांचं आयुष्य उभं केलं होतं आणि घरा-आतल्या त्यांच्या चिमूटभर राज्याचे ते अक्षरश: ‘सुलतान’ होते.

आई आणि आम्ही चार मुलं हे त्यांच्या राजवटीत भरडले जाणारे प्रजानन.     

रोजच्या रोज अण्णांची शाळेतून घरी यायची वेळ झाली की माझी आई, माझ्या तीन बहिणी आणि मी निव्वळ भेदरून जात असू.

माझी आई म्हणायची, ‘आईची मायाच त्यांच्या वाट्याला आलेली नाही कधी, म्हणून हे माणूस असं निर्दयी झालेलं आहे पहिल्यापासूनच’.

-0-

- आईची माया अण्णांच्या वाट्याला आलेली नाही, हे खरे आहे. अण्णांना त्यांची आई आठवत नाही. ते खूप अजाण असतानाच दोन नाकळती पोरं आणि नवरा अशा तिघांना मागे ठेवून ती माउली मरून गेलेली. खूप जुनी, एकोणीसशे चव्वेचाळीस-पंचेचाळीसच्या इसवी सनातली गोष्ट. अण्णा दोनतीन वर्षांचे असतील-नसतील, तेव्हाची. एक स्वत:हून जरासा मोठा भाऊ आणि विलक्षण तापट वडील अशांच्या सावलीत अण्णा जमेल तसं पाचवी की सातवीपर्यंत शिकले. सोलापूर जिल्ह्यातलं एक धूळमाखलं नखभर खेडं आमचं मूळचं गाव. तिथे शक्य असेल त्या वेळी याच्यात्याच्या वावरात मजुरीने कामाला जा, एरवी वडलांच्या हाताखाली सुतारकाम कर, असं करत करत त्यातूनच जमेल तसं शाळा शिकत राहणं. बहुधा सातवी झाल्यावर गावातली शाळा संपली, म्हणून मग शिक्षण संपलं. नंतर चालू झाले पूर्णवेळ काबाडकष्ट.

त्यावेळी सातवीवर नोक-या लागत. मधूनमधून कुठे कुठे नोकरीसाठी अर्जफाटे करत राहिल्यामुळे कधीतरी आलेलं मास्तराच्या नोकरीसाठीच्या मुलाखतीच्या ‘कॉल’चं पत्र न वाचताच कुणीतरी घराच्या खोपटाच्या पाखाडात की पत्र्याच्या आडूखाली खोचून ठेवलेलं, ते नेमक्या मुलाखतीच्या चारसहा दिवस आधी सापडलं. कधी न पाहिलेल्या, देखलेल्या लांब तिकडच्या ‘नांदेड’ नावाच्या गावात मुलाखत होती.

नांदेडला जायचं-यायचं म्हणजे काहीतरी का होईना रोख पैसे लागणार. तेव्हाच्या काळात एकुणातच माणसांकडे पैसा नावाची वस्तू नसे. सोळासतरा वर्षांच्या पोराजवळ पैसे असण्याची तर काही शक्यताच नव्हती. घरातून वडलांकडून, भावाकडूनही काही मिळणं कठीण. घरात टणक दारिद्र्याचाच पूर्वापार रहिवास. गावगाड्यात ‘बलुतेदारी’ नावाची वेठबिगारी करणा-या माणसाकडे नगदी पैसा कुठून असणार?

मग हा ‘प्रल्हाद तात्याबा सुतार’ नावाचा तो कोवळा गरजू पोरगा बार्शीजवळच्या त्या धुळकट खेड्यातून पायदळ चालत चालत नांदेड नावाच्या ठार अनोळखी शहराकडे जायला निघाला. किती लांब आहे, किती दिवस लागतील पोहचायला, कुठल्या वाटांनी चालायचं आहे, कशाचाच काही पत्ता नाही.

अंदाज बांधून मधल्यामधल्या वाटांनी माणूस दिसेल तिथे विचारत विचारत जायचं. बरोबर बांधून घेतलेल्या काही दोनपाच भाकरी असतील, त्या जपूनजपून खात वाट कातरायची, असं करत करत आटोकाट नेमक्या दिवशी नांदेडला पोहचून दिलेल्या त्या मुलाखतीतून पुढे काही निष्पन्न झालं नाहीच, पण परत गावाकडे येताना हाल हाल मात्र अतोनात झाले.

बांधून आणलेली भाकरी कधीच संपलेली, खिशात खडकू नाही, आणि उपासापोटी चालत शे-पन्नास मैल जायचं आहे.

रस्त्यात लागलेल्या गावांमधून कुणाकुणाच्या घराबाहेर हतबल हताश दीनपणे उभं राहून मागून घेतलेल्या भाकरीचे पुण्यवान तुकडे खाताना अण्णांना काय वाटलं असेल तेव्हा? चालून चालून पाय सुजलेले आहेत, पोटात भुकेने खड्डा पडलेला आहे आणि आडवाटेत लागलेल्या कुठकुठल्या अनोळखी गावांतल्या कुणाकुणा आईबाईच्या दारात उभं राहून आपण भाकरीची याचना करतो आहोत, हे दृश्य डोळ्यांपुढे उभं राहतं, तेव्हा माझ्या अंगावर भयाचा काटा उभा राहतो.

आपल्या बापाने हे साक्षात भोगलं आहे, या जाणीवेने मला भयंकर गलबलून येतं. आपला बाप तेवढी पायपीट करत गेला; चार दिवस का होईना, त्याने दरवेशासारखी रस्त्यात मागून भाकरी खाल्ली, म्हणून पुढे आजतागायत आपण घरात आयती भाकरी खाऊ शकलो, हे लक्षात आलं की माझ्या काळजात खोलवर रडू दाटून येतं.

पुढे नोकरी लागली आणि त्या काळात पगारापोटी जे काय दहावीस किंवा पन्नासशंभर रुपये मिळत असतील त्यात भागवताना पुढच्या आयुष्यात अण्णांनी कधीही कुणाकडून दया स्वीकारली नाही. याचिली नाही.

आईने सांगितलेलं मला आठवतं, अण्णांच्या नोकरीच्या नव्या गावात, महिनाभर घरात लागणारं किरकोळ वाणसमान गल्लीतल्या मारवाड्याच्या दुकानातून उधार आणलं जाई. पगाराच्या दिवशी शाळेतून येताना आधी ती उधारी भागवूनच अण्णा घरी यायचे. त्यावेळी गावात असलेली सगळीच दोनपाच नोकरदार मंडळी असंच करत. एकदा कधीतरी कसल्याशा घाईत घरी येताना देणं देऊन येण्याचा हा क्रम चुकला आणि संध्याकाळी मारवाडी दुकानदार वसुलीसाठी दारात आला. तो आमच्या दारात आलेला शेवटचा घेणेकरी. अण्णांनी त्याचं देणं दिलं, आणि त्यानंतर पुढच्या सबंध आयुष्यात त्यांनी कुठंही काहीही उधार घेतलं नाही.

बालपणात भोगलेलं अभावांचं सुख त्यांना आयुष्यभर पुरलं.

आपल्या पोरांच्या वाट्याला ते येऊ नये म्हणून अण्णांनी हयातभर धडपड केली.

ते शिक्षक होते, पण शाळेतून घरी आल्यावर ते कधीच रिकामे बसले नाहीत. ते कधी गावातल्या पारावर, कुणाच्या ओट्यावर चार माणसांच्या कोंडाळ्यात बसून गप्पा मारताना दिसले नाहीत. शाळेतून घरी आले की सायकल भिंतीशी लावून हातपाय धुवून आईने दिलेला चहा घ्यायचे आणि लगोलग फोटो फ्रेम करायच्या कामाला लागायचे.

आमच्या त्या वेळच्या गावातले ते एकमेव ‘फोटो फ्रेम-मेकर’ होते. आमच्या गावाच्या पंचक्रोशीतल्या दहापंधरा गावांतले ते एकमेव फोटोग्राफर होते. रविवारी, अन्य सुट्ट्यांच्या दिवशी सायकल चालवत ते गावाभोवतालच्या एकेका खेड्यात फोटो काढायला जात. या रविवारी काढलेले फोटो (रोल ‘धुवून’ आणून) पुढच्या रविवारी पुन्हा त्या त्या गावात जाऊन ज्याचे त्याला सुपूर्द करायचे.

शनिवारी गावातल्या आठवडी बाजारात रस्त्याकडेला ते वाळल्या मिरच्यांचं दुकान लावायचे. एक त्यांचं दुकान, एक आईचं, आणि पुढे आईच्या शेजारीच एक दुकान एखाद्या बहिणीचंही. अण्णा स्वत: मिरच्यांची पोती डोक्यावर लादून घेऊन घरापासून बाजारात नेत.

जमिनीवर चवाळं अंथरलेलं आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या लालबुंद तिखटजाळ मिरच्यांचे दोनतीन ढीग. त्या ढिगांच्या मध्ये तराजू आणि वजनं मांडून आपणही तिथेच मांडी घालून बसायचं. शनिवारी बाजारात कडक उन्हात दिवसभर सुक्या मिरच्यांच्या धुराळ्यात बसून आणि त्या जहाल मिरच्यांच्या ढिगात हात घालून घालून पुढे रविवारचा अख्खा दिवसभरही अण्णांच्या, आईच्या अंगांची निव्वळ आग आग होत राही.

-0-

- आत्ता इथे वार्ड नंबर पाचमध्ये अण्णा बेडवर पडलेले आहेत, पण ते शांत झोपत नाहीयेत. नाकावर लावलेला ऑक्सिजनचा मास्क काढून फेकायची सतत धडपड करत आहेत. सतत उठायचा प्रयत्न करत आहेत, इथेतिथे अंगावर हाताने खाजवण्याच्या प्रयत्न करत आहेत.

एकदोनदा तर मी त्यांच्या शेजारून उठून काहीतरी आणायला पाचदहा मिनिटं बाहेर गेलो आणि परत आलो तेव्हा ते बेडवरून उतरून खाली थंड फरशीवर पहुडलेले दिसले. ‘असं का?’ म्हणून विचारलं, तर म्हणाले, ‘आग होतेय माझ्या अंगाची.. खूप आग आग आग..’

कशाने ही अशी आग आग आग होत असेल त्यांच्या अंगाची? आयुष्यातली पंचवीसतीस वर्षे नाकात आरपार भिनलेला मिरच्यांचा तिखटजाळ खाट त्यांना असं तगमगायला लावतोय का आत्ता या शेवटच्या दिवसांत?

काय होतंय तुम्हाला, अण्णा? काय होतंय?

नाकावरचा ऑक्सिजनचा मास्क काढू पाहणारा त्यांचा हात अडवून मी त्यांच्या कानांवर झुकून विचारलं, अण्णा काय होतंय तुम्हाला?

‘मला घरी घेऊन चल. मला इथे राहायचं नाही. घरी घेऊन चल मला..’ अण्णा अस्वस्थपणे तगमगत म्हणाले. त्यांचे डोळे लालबुंद झाले आहेत. दवाखान्यात आल्यापासून मागचे सहासात दिवस आणि तितक्याच रात्रीही त्यांना झोप नाहीय अजिबात.

“सुधी.. सुधी कुठाय? सुधीला बोलाव.. नवरा इकडं तडफडतोय आणि ती घरी बसलीय चैनीत.. तिच्या मायला..” अण्णांना सतत माझ्या आईची आठवण येतेय. ‘सुधा’ हे माझ्या आईचं नाव. अण्णांनी ते कधीही नीटपणे ‘सुधा’ असं उच्चारलं नाही. घरात असो की बाहेर चारचौघात कुठेही; ते तिला ‘सुधेss..’ अशीच हाक मारत. पुढ्यात नातवंडं आली, नंतर पणतवंडंही आली. आईचं आणि त्यांचं सहजीवन साठएक वर्षांचं. एवढ्या दीर्घ आयुष्यात अण्णांनी एकदाही आईला ‘सुधा’ अशी हाक मारल्याचं मला आठवत नाही. आईलाही आठवत नसेल.

आता इथे कोविड-फाईव्हमध्ये पडून असलेल्या अण्णांना सतत तिची आठवण येतेय. ती प्रेमापोटी येत असेल का?

आपण दवाखान्यात पडून आहोत आणि आयुष्यभर आपल्या हाताशी गुलामासारखी राबवलेली आपली बायको सुखाने घरी बसून आहे, एकदाही इकडे येऊन ती आपली चौकशी करत नाही, हे त्यांच्या तगमगीमागचं कारण आहे, असं मला वाटत राहतं. माझ्या बहिणीलाही तसंच वाटतं. माझ्या सगळ्या बहिणी रोजचा खायचा डबा करून द्यायला आल्या आहेत.

‘कोविड वार्ड नंबर फाईव्ह’ हे एक मध्यम आकाराचं दालन आहे, त्यात भिंतींच्या दुतर्फा एकमेकांसमोर सात सात बेड्स आहेत. आत प्रवेश केल्यावर पहिल्याच बेडवर अण्णा आहेत. एकूण चौदा बेड्सपैकी तीनचार बेड रिकामे आहेत, अण्णांच्या रांगेच्या शेवटाशी असलेल्या बेडवरच्या पेशंटच्या सोबतीला एक माझ्या आईच्या वयाच्या बाई आहेत. एका भयंकर लांबलचक गारठलेल्या रात्री अण्णांच्या शेजारच्या स्टुलावर भिंतीला टेकून बसूनबसून थकून गेल्यावर, अण्णांना जराशी झोप लागलीय असं पाहून मी बाहेर आलो आणि आवारात गाडीत झोपलेल्या भाच्याला उठवून ‘आता तू मध्ये जा आणि स्टुलावर बस. मी थोडासा झोपतो..’ असं सांगितलं. अॅडमिट केल्यावर दुस-या दिवशी पहाटे अण्णांनी जबरदस्त तापेच्या सणकेत सलाईनच्या बाटलीसकट आणि लघवीच्या बॅगसकट वार्डबाहेर येऊन आवारात दंगा केल्यानंतर तिथल्या ड्युटीवरच्या मुख्य ब्रदरने अण्णांच्या केसपेपरच्या मागच्या बाजूवर ‘मी दिवसरात्र माझ्या पेशंटच्या शेजारी बसून राहीन..’ असं माझ्याकडून लेखी लिहून घेतलं. (‘रुग्णाच्या नातेवाईकांनी कोविड वार्डात प्रवेश करू नये’ अशी सक्त सूचना लिहिलेला फलक वार्डाच्या बाहेर लावलेला आहे. तरीही पेशंटच्या सोबत नातेवाईकाने बसून राहण्याचा ‘वचननामा’ लिहून घेणं, हे खास सरकारी कर्मचा-याच्याच कार्यकुशलतेचं उदाहरण आहे.). त्यानंतर ‘अविनाश’ हा माझा भाचा शंभर किलोमीटरवरच्या त्याच्या गावाहून मला सोबत करायला आला. तो उठला, आणि झोप जावी म्हणून त्याने बाटलीभर पाण्याने तोंड धुतलं. मग लघवीला जाऊन आला आणि मग वार्डात गेला. दोन मिनिटात लगेचच बाहेर आला आणि त्याने मला हाक मारली.

मी बाहेर येऊन अविनाश आत जाईपर्यंतच्या अवकाशात अण्णा कॉटवर उठून बसले आणि त्यांनी इकडेतिकडे पाहिले. शेवटच्या बेडशेजारी बसून अर्धवट झोपेत असलेल्या त्या बाई त्यांना दिसल्या. त्यांनी आधी क्षीण आवाजात ‘सुधे.. सुधे..’ अशा हाका मारल्या. ते आपल्याला हाक मारत आहेत हे त्या बाईंना कळण्याचं काही कारण नव्हतं. त्या फक्त पाहत राहिल्या. अण्णांचा संताप अनावर झाला. सुधी तिथे बसून आहे आणि ओ देत नाही? भयंकर चिडून त्यांनी उशाशेजारी असलेली पाण्याची बाटली उचलली, जीव खाऊन बाईंच्या दिशेने फेकून मारली. सात बेड्स ओलांडून ती बाईपर्यंत पोहचली नाही, तेव्हा चिडून ते उठले आणि शेजारी टांगलेली सलाईनची बाटली हातात घेऊन झोकांडत चालत शेवटच्या बेडपर्यंत गेले, तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ती सुधी नाहीय. त्यांनी त्या बाईला नमस्कार केल्यासारखे हात जोडायचा प्रयत्न केला आणि पुन्हा हेलपाटत ते स्वत:च्या बेडवर येत होते, तोवर अविनाश आत गेला. त्याने त्यांना धरून कॉटवर निजवलं आणि मला हाक मारायला तो बाहेर आला.

आत जाऊन मी बाईंची क्षमा मागितली, तेव्हा बाई म्हणाल्या, ‘जाऊ दे भाऊ, म्हातारं माणूस आहे. बापासारखं आहे माझ्या. मला राग नाही आला. माझा बापही असाच तापट होता’.

बापांची ती सबंध पिढीच असली सणकराम तापट माथ्याची होती का?

(कोविडच्या सबंध काळात औरंगाबादेत रुग्णांच्या मदतीसाठी अहोरात्र झटत आलेला नीलेश राऊत हा माझा मित्र नंतर मला म्हणाला, करोना गंभीर अवस्थेत जातो तेव्हा बहुसंख्य पेशंट असे सतत अस्वस्थ होताना, ‘हायपर’ होताना दिसतात. जवळच्या माणसांवर रागावणं, चिडचिड होणं, शिव्या देणं, हात उगारणं हे करणारे खूप पेशंट नीलेशने पाहिले होते. फुफ्फुसं कोंडलेली असतात, श्वास लागत असतो, शरीरात ऑक्सिजन पुरेसा जात नसतो, या सगळ्याचा परिणाम पेशंटच्या ‘व्हायलंट’ होण्यात होतो. नीलेश मला म्हणाला, आपल्या त्या याचे वडील दवाखान्यात कसल्या भयानक शिव्या द्यायचे, तू ऐकलेलं नाहीस. आम्ही रोज डॉक्टरांची हात जोडून माफी मागायचो. करोनाच्या शेवटच्या टप्प्यात माणसाला त्रासच भयंकर होतो रे!)

अण्णांनी वार्डात त्या बाईंकडे पाण्याची बाटली फेकल्याचं कळल्यावर, ‘आईला इकडे आणायचं नाही’, हा माझ्या मनातला विचार पुन्हा पक्का झाला.

मुदलात, आईला इकडे आणता येणं शक्यही नव्हतं. अण्णांना इकडे आणून अॅडमिट केलं, त्याच दिवशी आईचीही आरटीपीसीआर चाचणी केली, त्या चाचणीच्या अहवालात ‘ती करोनाबाधित आहे’ असं लिहून आलं होतं.

लगोलग, इथून दहा किलोमीटर दूर असलेल्या दुस-या कोविड सेंटरमध्ये आईला पाठवण्यात आलं होतं.

-0-

- अगदी पहिल्या दिवशी आईने मला फोन केला आणि अण्णा आजारी आहेत आणि मलाही थोडासा त्रास होतोय असं सांगितलं, तेव्हा मी आईला म्हणालो, ते येत नसतील तर तू एकटी जा गावातल्या दवाखान्यात. मी आजच रात्री इकडून निघतो आणि उद्या सकाळी तिकडे पोहचतो. बाकीचं मी आल्यावर बघू.

खरं सांगायचं तर मला तेव्हा अण्णांच्या कोविडबाधेची, आणि त्याहून तिच्या गंभीर अवस्थेची, काहीच कल्पना आलेली नव्हती. मागच्या एकदोन वर्षांत अधूनमधून असं काहीतरी दुखणं उद्भवत होतंच. माहित झालं, की गावाकडे जाऊन जबरीने अण्णांना दवाखान्यात घेऊन जायचं. डॉक्टरांनी सांगितलेली दोनचार दिवसांची औषधं खाल्ली (जबरदस्तीने खायला लावली), की अण्णा बरेच ठाकठीक होत. शेवटपर्यंत त्यांचं शरीर अतिशय काटक होतं. वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षीही ते गॅसचं भरलेलं सिलेंडर सायकलवर लादून अर्धापाऊण किलोमीटरवरून घरी घेऊन येत. एका झटक्यात दोनपाच किलोमीटर पायी हिंडून येत. राहत्या गावापासून नोकरी असलेल्या गावापर्यंत जाऊन-येऊन असं रोजचं दहाएक किलोमीटर अंतर ते अनेक वर्षे चालत जायचे. नंतर त्यांनी एक भली दांडगी चोवीस इंची मजबूत सायकल विकत घेतली आणि पुढची अनेक वर्षे ते सायकलीवरून रस्ता कापू लागले. नोकरीच्या शेवटच्या काही वर्षांत त्यांनी हप्त्याने एक मोपेड विकत घेतली. ‘अवंती गरेली’ नावाची ती मजबूत मोपेड धावण्यापेक्षा रस्त्यात बंद पडण्यासाठीच अधिक मशहूर झाली होती. जवळजवळ रोजच, जिथे बंद पडली तिथून रेटत ढकलत ओढत अण्णा तिला गावाकडे घेऊन येत. एकुणातच त्यांची पायपीट आयुष्यभर संपली नव्हती.

त्या वणवणीमुळेच कदाचित, त्यांची तब्येत नेहमीच ठणठणीत राहिली असेल.

ते कधीही दिवसा झोपत नसत. सतत काही ना काही कामधंदा चालूच.

काटकपणामुळेच बहुधा, त्यांना कधीही काही गंभीर आजारपण उद्भवलं नाही. घरी किंवा हॉस्पिटलमध्ये ते चारआठ दिवस पडून आहेत, असं एकदाही मला आठवत नाही. त्यामुळे, आईने फोन केला तरी माझ्या मनात फारशी काळजी वगैरे उमटलेली नव्हती. शिवाय काळजी करून काही उपयोगही नव्हता. मी माझ्या गावापासून सव्वाचारशे किलोमीटर अंतरावर होतो. रात्रीची गाडी पकडून मी निघालो आणि भल्या सकाळी अंबाजोगाईत पोहचलो. तिथे स्टँडवर एसटीची वाट पाहत बसण्याऐवजी एका मित्राची मोटारसायकल घेऊन सकाळी अगदी सातच्या सुमारास घरी पोहचलो.

अण्णा अतिशय वाईट अवस्थेत होते. त्यांना सणसणून ताप आलेला होता. खूप खोकला. आणि त्यांना रात्रभर ढाळ लागलेले होते. रात्रभर ते संडासाच्या फे-या मारत होते. आई म्हणाली, पहाटे पहाटे तर अगदीच उठवेनासं होऊन त्यांच्याकडून अंथरूण खराब झालं. गादी, अंगावरचे कपडे सगळं घाणीने भरून गेलं. तशाही अवस्थेत ते आईचं काहीही ऐकून घेत नव्हते. अगदी संडासाकडे जाताना तिने आधार देऊन न्यायचा प्रयत्न केला तर तेव्हाही तिरीमिरीने तिचा हात झटकून संडासाकडे जायच्या आधीच ते चक्कर येऊन खाली पडले.

आई रात्रभर गाईसारख्या डोळ्यांनी पाझरत राहिली. तशाही अस्वस्थेत तिच्या नव-याचं तोंड चालूच होतं. ‘फोन करून लेकाला बोलावलंस, तुझ्या आयला तुझ्या.. काय झालेलं नाही मला. मी माझ्यामाझ्या औषधाने बरा होईन. मेलो तरी दवाखान्यात जाणार नाही’, वगैरे.

दोन हजार एकवीसच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये, कोविडच्या दुस-या लाटेत, आमच्या टीचभर गावात तब्बल शंभरावर लोक करोनाने मृत्युमुखी पडले होते. सगळीच नित्याच्या ओळखीतली, रोजच इथेतिथे भेटणारी-बोलणारी माणसे. आपण दवाखान्यात गेलो, तर डॉक्टर आपल्यालाही करोना ‘काढतील’ आणि नंतर गावातल्या त्या सगळ्या माणसांसारखे आपणही मरून जाऊ, अशा भीतीच्या धसक्याने ते घराबाहेर पडायलाच तयार नव्हते, हे खूप नंतर माझ्या लक्षात आलं. ‘करोना वगैरे काही नाही, एक माणूस करोनाबाधित ‘दाखवला’ की सरकारकडून डॉक्टरला दीड लाख रुपये मिळतात, त्यामुळे डॉक्टर आणि दवाखाने कुणालाही करोनाग्रस्त दाखवून दवाखान्यात डांबून ठेवतात’ अशी एक अफवा करोनाच्या अगदी पहिल्या लाटेपासूनच आमच्या भागात पसरलेली होती. अण्णा त्या अफवेला बळी पडले असतील का?

‘आपल्याला आत्ताच्या आत्ता दवाखान्यात जायचं आहे.’ असं निग्रहाच्या सुरात त्यांना सांगून मी बाहेरून सहाआसनी रिक्षा भाड्याने आणला. (आमच्या गावात रुग्णवाहिका नाही.) (त्याच दिवशी मी आमची गाडीही मागवून घेतली, पण ती माझ्यापर्यंत पोहचायला दुसरा दिवस उजाडला.) अण्णांना रिक्षाच्या मधल्या सीटवर झोपवलं. त्यांच्या डोक्याखाली उशी द्यायला हवी हे तशाही अवस्थेत आईच्या लक्षात आलं. ती उशी घेऊन आली आणि ती त्यांच्या डोक्याखाली ठेवून आपण पायांशी बसली. रिक्षा निघाली. मी घराला कुलूप लावलं आणि मोटारसायकल घेऊन रिक्षाच्या मागोमाग जायला निघालो तेव्हा मला पाच मिनिटे अडवून घराच्या ओट्यावर बसलेल्या शेजारच्या बायांनी ‘अण्णांनी आईला मागच्या काही दिवसात कसा आणि किती त्रास दिला’ हे तळतळून मला सांगितलं.

दवाखान्यात पोहचलो. दरम्यान आधीच तिथे पोहचलेल्या माझ्या मित्राने त्यांच्या नावाने दवाखान्याचा पेपर काढून तयार ठेवला होता. अण्णांची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी त्यांची तिथे कॅज्यूअल्टीमध्येच अॅन्टीजेन टेस्ट केली, ती ‘पॉझिटिव्ह’ आली आणि लगेचच एका निव्वळ खडखडाट करणा-या लोखंडी स्ट्रेचरवरून ढकलत त्यांना ‘कोविड वार्ड नंबर फाईव्ह’मध्ये दाखल करून घेतलं.       

आईला फार त्रास नव्हता. तिची आरटीपीसीआर टेस्ट केली. दोन दिवसांनी तिचाही रिपोर्ट पॉझिटिव्हच आला आणि कमी लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी गावाबाहेर दहाएक किमी अंतरावरच्या दुस-या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये तिलाही अॅडमिट केलं गेलं. पुढचे सलग दोन आठवडे मी आणि अविनाश, अण्णा असलेल्या वार्ड नंबर पाचपासून आई असलेल्या कोविड केअर सेंटरपर्यंत दहा दुणे वीस किलोमीटर फे-या मारत राहिलो. आईकडे फार बसून राहण्याची गरज नव्हती. पण निदान चौदा दिवस तिथे निगराणीत राहिल्यानंतरच तिला तिथून बाहेर येणे शक्य होते.

अण्णांच्या तब्येतीच्या काळजीने तिला तिथे रात्ररात्रभर झोप लागत नसे.

अण्णांना वाटत होतं, तसं, ती घरी निवांत बसलेली नव्हती.

शेवटच्या काही दिवसात अण्णांना तिच्याबद्दल ओढ वाटत होती का? एकदा राऊंडला आलेल्या डॉक्टरांना ते म्हणाले, ‘मला माझ्या पत्नीला एकदा भेटायचं आहे. तिला माझ्याकडे आणायला सांगा..’. आईच्या कोविडबाधेबद्दल अनभिज्ञ असलेले डॉक्टर माझ्याकडे पाहत अण्णांना म्हणाले, ‘आणू या की. हे घेऊन येतील इकडे त्यांना’.

‘ती स्वत:च तिकडे अॅडमिट आहे’ असं मी डॉक्टरांना सांगितलं, तर अशक्त हतबलतेने आणि तरीही चिडून माझ्याकडे पाहत अण्णा डॉक्टरांना म्हणाले, ‘खोटं बोलतोय हा, तिला काही झालेलं नाही. ती घरी बसलेली आहे. डॉक्टर, मला एकदाच तिला भेटू द्या.’

आई अजून रडते. म्हणते, ‘शेवटच्या काळात का होईना, त्यांना मला भेटायचं होतं हो! मला माझ्या पत्नीला भेटायचं आहे असं म्हणत म्हणत ते गेले.. त्यांना मला काहीतरी शेवटचं सांगायचं होतं..’

अण्णांना घरी परत यायचं होतं. एकदा एका नर्सला ते म्हणाले, ‘माझ्या लेकीसारखी आहेस तू. तुला एक कोटी रुपये देतो. मला फक्त एक तासभर माझ्या घरी जाऊन येऊ दे.’

आणखी एकदा डॉक्टरला म्हणाले, ‘घरी जाऊन येऊ द्या मला. एका तासात माघारी नाही आलो, तर माझी जीभ कापून घ्या. मी शिक्षक आहे. खोटं बोलणार नाही.

अण्णांचा जीव घरात गुंतलेला होता का? की आईत गुंतलेला होता? मरणवेळी माणसाला कशाची तीव्रतर ओढ वाटत असेल?

अण्णांचा कशात जीव गुंतलेला असेल, हे मला कधीकाळी खरंसुद्धा वाटलं नसतं. हळव्या भावना त्यांच्यात नाहीच आहेत, असंच आम्ही वर्षानुवर्षे गृहीत धरून चाललेलो होतो.

त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न करून, घर सोडून मी शेजारच्याच दुस-या गावात राहायला गेलो तेव्हा दोनतीन वर्षे आमची एकदाही भेट झाली नव्हती. एकदा मी माझ्या व्यवसायाच्या कामासाठी पुण्याला गेलेलो असताना, फोन करण्यासाठी शिवाजीनगरच्या स्टँडवरच्या एसटीडी फोन बूथमध्ये गेलो, तेव्हा अकस्मात ध्यानीमनी नसताना तिथे फोनवर बोलत असलेले अण्णा दिसले. मीही त्यांना दिसलो. तब्बल अडीचतीन वर्षांनंतर आम्ही एकमेकांच्या दृष्टीस पडलो होतो. माझ्यावर नजर पडताच त्यांनी एकदम फोन खाली ठेवला आणि बूथवाल्यासमोर एक नोट ठेवून ते झटक्याने तिथून बाहेर पडले. मी निश्चलपणे त्यांना जाताना पाहत राहिलो. मागे धावत जाऊन त्यांना अडवण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं. जड अवस्थेत काही क्षण गेल्यावर मी तिथून एक फोन केला, आणि बाहेर पडलो. शंभर पावलं चालून गेलो तेव्हा एकाएकी मला पुन्हा अण्णा दिसले. रस्त्याच्या कडेला एका खांबाला टेकून उभे राहून ते ओक्साबोक्शी रडत होते. आयुष्यात पहिल्यांदा (आणि शेवटचंही) मी त्यांना तिथे रडताना पाहिलं. आपोआप माझ्याही डोळ्यांतून पाणी वाहायला लागलं. मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांचा हात धरून काहीतरी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा हिसक्याने माझा हात झटकून सपाट्याने चालत ते गर्दीत नाहीसे झाले.

त्याआधी, माझा पहिला मुलगा जन्मला तेव्हा ते नातवाला बघण्यासाठी गुपचूपपणे वार्डात येऊन लांबूनच त्याच्यावर नजर टाकून अक्षरश: अर्ध्या मिनिटात ते तिथून लगेचच परत गेले, असं त्यावेळी माझ्या पत्नीच्या शुश्रुषेसाठी तिच्यासोबत थांबलेल्या माझ्या मित्राच्या आईने नंतर मला सांगितलं होतं. दुपारच्या सुनसान वेळी ते दवाखान्यात आले, त्यावेळी बाळाला कुशीत घेऊन माझी पत्नी झोपलेली होती आणि मी पोटापाण्याच्या उद्योगात दवाखान्याबाहेर होतो. ते येऊन गेल्याचं आम्हा दोघांनाही खूप नंतर माहित झालं.

आत्ता दवाखान्यात मृत्यूशय्येवर, पण जराशा स्थिर मानसिक अवस्थेत असताना, एकदम आठवण येऊन ते मला म्हणाले, ‘पोरांना का आणलं नाहीस. बघावं वाटतंय. त्यांना घेऊन ये.. प्रतिभाला बोलाव..’

कोविडच्या भीतीने मी पोरांना दवाखान्यात येऊ दिलं नव्हतं. त्याच रात्री अण्णांची तब्येत अधिक बिघडली. नंतर पोरं आणली असती तरी अण्णांना ती दिसली नसती.

तापेच्या अर्धवट ग्लानीत माझ्या भाचीचं नाव घेऊन एकदा म्हणाले, दीदीचं लग्न करायचं यंदा आपल्याला. उद्या गाडी काढ. त्या फलाण्या गावाला जाऊन येऊ आपण. तिथे एका सोय-याचं चांगलं पोरगं आहे, असं कळलंय.

घरापाठोपाठ अण्णांचा जीव नातवांमध्ये अडकला असेल का? शेवटी आईसोबत त्यांना सुनेचीही आठवण झाली असेल का? पोराने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करून घरात आणलेल्या सुनेवर शेवटच्या पाचदहा वर्षांच्या काळात त्यांचा माझ्यापेक्षा अधिक विश्वास होता. तिचा शब्द ते सहसा खाली पडू देत नसत. अतिशय अडचणींतून मार्ग काढत आपली सून ‘क्लास-टू’ श्रेणीची शासकीय अधिकारी झाली, याचा त्यांना अभिमान वाटत असे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतल्या तिच्या यशाचं वृत्त कळलं, तेव्हा त्यांनी गल्लीभर पेढे वाटले होते.

मृत्यूच्या दोन दिवसांआधी, मध्यरात्री जाग आल्यावर अस्वस्थपणे इकडेतिकडे टकाटका पाहत, ‘आपण कुठे आहोत? घरी आलोय की दवाखान्यातच आहे मी अजून?’ असं विचारून गयावया केल्यासारख्या आवाजात अण्णा मला म्हणाले, ‘तुझ्या पाया पडतो, मला घरी घेऊन चल..ऐक माझं एवढं तू..’

त्यांचा तो सूर ऐकताना माझ्या काळजात हललं खूप खोलवर. खूप मोठ्ठ्यांदा आवाज करत ढसाढसा रडावं असं वाटायला लागलं मला. मला वाटलं, आपण रडलो नाही, तर दाब असह्य होऊन आपली छाती फुटून जाईल.

अत्यवस्थ अवस्थेत आपल्याला घरी जाता येणं शक्य नाही, हे अण्णांना सांगायचं कसं?

आयुष्यभर पै-पै मिळवून, साठवून, स्वत: राबून बांधलेल्या घराच्या भिंतींमध्ये त्यांचा जीव अडकलेला होता का?  

-0-

- नोकरीच्या निमित्ताने गावं आणि भाड्याची घरं बदलत अर्धं आयुष्य गेल्यावर आमचं कुटुंब या आताच्या गावात स्थिर झालं. असंख्य भारतीय खेड्यांसारखं दोन वेशीच्या आत बंदिस्त लहानसं गाव. अगदीच लहानसं असलं तरी बारावीपर्यंतची शाळा, बारीकसं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दर शनिवारी नेमाने भरणारा आठवडी बाजार, यामुळे हे गाव कायम राहण्यालायक होतं. इतरांच्या घरात किरायाने राहताना जो त्रास होतो, त्याला पुरेपूर वैतागून नव्वदच्या सालात इथे जमिनीचा एक बारीकसा तुकडा विकत घेऊन अण्णांनी सहा खोल्यांचं घर बांधलं. आधी ते माती-डबरात बांधलं होतं. बांधून झाल्यावर पहिल्याच पावसात ते चारी दिशांनी कोसळलं. नंतर काही वर्षांनी अण्णांनी ते सगळंच पाडून दगडाविटासिमेंटने बांधून काढलं. आधीचं घर जुन्या वाड्यासारखं बांधलं होतं. ते बांधायला खास एक गवंडी आमच्या मूळच्या गावातून त्यांनी आणला. त्या गवंड्याच्या हाताखाली ते घर बांधताना माझी आई, माझ्या बहिणी, माझे एक मेहुणे आणि क्वचित मीही सबंध बांधकाम संपेपर्यंत राबलेलो होतो. शाळेतून आल्यावर अण्णा स्वत: फावडं घेऊन चिखलाच्या रांध्यात उतरत. मुख्य गवंड्याशिवाय, त्या बांधकामात बाहेरचा एकही मजूर नव्हता. घरात राहणा-या माणसांनी श्रम करून स्वत:साठी बांधलेलं घर होतं ते!

हा आमच्या मूळ गावाकडून मुद्दाम आणवलेला गवंडी इतका अप्रतिम बांधकामतज्ज्ञ होता की त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी स्वत: खपून बांधलेलं ते चिखलामातीचं घर लगेचच पुढच्या पावसात ढासळलं. त्यानंतर नवं घर बांधण्याच्या काळात मात्र मी तिथे नव्हतो. गावाशेजारच्या शहरात मी माझा व्यवसाय उभा केला होता आणि त्याच काळात नंतर प्रेम करून लग्न केलं. लग्न करण्याआधी आणि केल्यावरही, मी माझ्या आणि माझ्या मैत्रिणीच्या घरी स्वत: जाऊन त्याची कल्पना दिली होती.

मुलीच्या आईवडिलांनी माझं म्हणणं ऐकून घेऊन तोंडाने शिव्याशाप दिले. अण्णांनी मात्र माझं एक अक्षरही ऐकून घेतलं नाही. मी समोर दिसताक्षणी त्यांनी अंगणात पडलेलं त्यांचं दणकट पायताण उचललं आणि त्या निब्बर गावठी चपलेने मला सटासटा दहावीस रट्टे हाणले.

तो खेटराचा मार खाऊन अंगावरच्या कपड्यानिशी मी घराबाहेर पडलो, त्यानंतर तीनचार वर्षांनी एका दिवाळीत घरी आलेल्या माझ्या भाच्यांच्या हट्टामुळे अण्णांनी आम्हाला घरात यायला परवानगी दिली.

पुढच्या काळात, माझ्या मुलांचे त्यांनी जे लाड केले, ते माझ्या किंवा माझ्या बहिणींच्याही वाट्याला कधीच आलेले नव्हते.

अण्णांचं किंवा आजीचं डोकं दुखतंय किंवा त्यांना काही सर्दीपडसं झालंय असं कळलं की सहाआठ वर्षांचा माझा लहाना मुलगा त्यांना फोन करून ‘अण्णा, ‘ओम्नी जेल’ आणा आणि डोक्याला लावा’ असा टीव्हीतल्या जाहिरातीतून संपादन केलेला काहीच्या काही वैद्यकीय सल्ला द्यायचा तेव्हा, एरवी कुणाचंही काहीही ऐकून न घेणारे अण्णा बिनबोभाट त्याचा सल्ला मानायचे आणि बाजारात जाऊन ओम्नी जेल विकत घेऊन यायचे.

या आठ वर्षाच्या मुलाला ते फोनवर ‘बोला डॉक्टरसाहेब..’ असं म्हणायचे.

अण्णांना जाऊन वर्ष होत आलं, अजूनही त्यांच्या मनाविरुद्ध त्यांच्या आयुष्यात आलेली त्यांची सून त्यांच्या फोटोकडे बघताना दाटल्या डोळ्यांनी म्हणते, अण्णा जायला नको होते. नको होते अण्णा जायला.

अण्णांचा जीव कुणात गुंतलेला होता? बायको, मुली, नातवंडं? घर?

माझ्यात नक्की नव्हता.

एकुलता असलो तरी, मी कधीही अण्णांचा लाडका मुलगा नव्हतो.

-0-

- मला आठवतं, तेव्हापासून मी अण्णांचा अतोनात मार खाल्लेला आहे.  नुसत्या मी एकट्यानेच नव्हे. आईने, माझ्या तिन्ही-चारी बहिणींनीही.

रोज संध्याकाळी अण्णा आम्हाला अभ्यासाला बसवायचे. ‘सुतारगुरुजींची मुलं हुशार आहेत’, असं लोकांनी म्हणावं अशी त्यांची इच्छा असे.

तो दैनिक अभ्यास म्हणजे निव्वळ छळछावणी असे. गणितात ‘हातचा’ घ्यायचा राहिला आहे असं ते तोंडाने सांगत नसत, फाडकन मुस्कटात हाणली जाई. ती कानफटात इतक्या जोरकस बसे की अनेकदा मी बसल्याजागी चड्डीत मुतत असे.

आईला मारझोड करायला तर काहीही किरकोळ कारण चालत असे.

मागच्या काही वर्षांपासून आईला कानाने कमी ऐकायला यायला लागलं, त्यानंतर तिच्या बहिरेपणाची चीड येऊनही त्यांनी कित्येकदा तिला मारहाण केल्याचं मला काही दिवसांनी माहित होई.

अण्णा मारत, म्हणजे ते निव्वळ लढाई चालू असल्यासारखं करत. हाताने, लाथेने, चपलेने, लाकडाने असं त्या त्या वेळी सोयीस्कर वाटेल अशा कशानेही ते बायकोला, आम्हा मुलांना बडवत. त्यांची मर्जी बिघडायला काहीही कारण पुरत असे.

वहीत रेघा ओढण्यासाठी लागणारी रुपयाभर किमतीची लाकडी पट्टी त्यांना न विचारता मी गावातल्या दुकानातून उधार घेतल्याचं कळलं, तेव्हा रात्री अण्णांनी लाकडी रुळाने माझा हात फोडून काढला होता. पुढे कित्येक दिवस मला त्या हाताने काही लिहिता आले नव्हते. त्याच दरम्यान माझी सातवीची वार्षिक परीक्षा आली तेव्हा फुटलेल्या बोटांमुळे पेपरात काहीच नीट लिहिता न आल्यामुळे सातवी बोर्डाच्या त्या परीक्षेत मी ‘बढती’ या श्रेणीत कसाबसा पास झालो होतो.

त्या निकालानंतरही अण्णांनी माझं कानसूल हाणलं होतं.

गोष्टीची पुस्तकं वाचतो म्हणून, अभ्यास न करता रात्री लवकर झोपी गेलो म्हणून, दुपारी नदीवर पोहायला गेलो म्हणून, दुकानातून काहीतरी वस्तू विकत घेऊन परतताना मोडीत आलेलं दहा पैशाचं नाणं हरवून आलो म्हणून, गल्लीत गोट्या खेळताना दिसलो म्हणून, गावात तेव्हा नवीनच आलेल्या व्हीडीओवर सिनेमा बघायला गेलो म्हणून, शाळेत खेळताना सद-याच्या गुंड्या तोडून आलो म्हणून – अशा अक्षरश: शेकडो कारणांवरून मी त्यांचा शेकडो वेळा मार खाल्लेला आहे.

आत्ता मागच्या काही वर्षांत अण्णा जरासे बदलले होते का?

आमच्या घराच्या दारात चिकूचं एक दांडगं झाड आहे. एक अंजीराचंही आहे. दोन्ही झाडं घराच्या गच्चीच्याही वर उंच वाढलेली आहेत.

मी गावाकडे येतो, आणि दुपारी जेवायला बसायची वेळ होते, तेव्हा अण्णा हमखास गच्चीवर जाऊन चांगले चांगले चिकू, लालबुंद अंजीर शोधून शोधून तोडून आणून माझ्या ताटात ठेवत. ‘मला नको’ म्हणालो, तर दम देऊन खायला सांगत. ‘तुम्ही खा’ म्हणालो तर, ‘आम्ही रोजच खातो. हे तुझ्यासाठी काढलेत, तू खा’.

आईने चहा दिला की अण्णा डब्यातून बिस्किटांचा पुडा घेऊन येत. चहासोबत बिस्किटे ही त्यांची चैनीची एक कल्पना होती. आपल्या पोराने ती करावी असं त्यांना आत्ता उतारवयात सतत वाटे.

आम्ही येण्याआधी नातवंडांना आवडणा-या वस्तू विकत आणून त्यांनी डबे भरभरून ठेवलेले असत. चिवडा, फरसाण, सफरचंदे, जिलेब्या, काजू, बदाम असं काय वाट्टेल ते सामान भरभरून आणून ठेवलेलं असे आणि नातवंडे आल्यावरच ते खायला काढायचं असे.

पोटापाण्याच्या उद्योगात आम्ही परत जायला निघालो, की आईअण्णांच्या पाया पडायचो. (ही रीत माझ्या बायकोने घालून दिलेली. आधी मी असं काही करायचो नाही. ती पाया पडली की लाजेकाजेने मलाही तसे करावे लागे. नंतर माझ्या लक्षात येत गेलं की वडीलधा-यांच्या पाया न पडण्यात काहीही शहाणपण नाही, असलाच तर काहीसा आडमुठेपणाच आहे.) पायांशी वाकल्यावर अण्णा त्यांचा रखरखीत हात हळुवारपणे पाठीवर फिरवत आशीर्वाद देत. नंतर नंतर हा आशीर्वाद घेणं मला आवडायला लागलं होतं.

दरवेळी आम्ही जायला निघालो की अण्णा सद-याच्या खालून त्यांच्या मुद्दाम शिवून घेतलेल्या बनियनच्या खिशात तिरपा हात घालून आतूनच बोटांनी चाळून शंभराच्या दोन नोटा काढत आणि दोन्ही नातवांच्या हातात एकेक नोट देत. नंतर पुन्हा खिशात हात घालून नेमकी पाचशेची एक नोट काढून सुनेच्या हातात द्यायची. सरतेशेवटी खिशातून वट्ट हजाराची नोट बाहेर येई. ती माझ्या खिशात घातली जाई. ‘बाबाला जास्त पैसे कशासाठी?’ असं कुणी विचारे, तेव्हा सांगत की जातायेताना गाडीत पेट्रोल भरण्यासाठी ते दिले आहेत. बाबाला चैन करण्यासाठी दिलेले नाहीत.

माया व्यक्त करण्याची अण्णांची ती शैली आहे, हे माझ्या खूप नंतर लक्षात यायला लागलं.

आयुष्यभराच्या धकाधकीत त्यांना कधी ते नीटपणे सांगता आलेलं नव्हतं.

आईची-बहिणीची (किंवा बापाचीही) माया कधीच लाभलेली नसलेल्या, लहानपणातच आईविना पोरक्या झालेल्या, ‘प्रल्हाद तात्याबा सुतार’ नावाच्या माझ्या बापाची ‘वत्सलता’ या शब्दाशी सलगी असल्याचं कधीच उघडपणे दिसलेलं नसलं तरी, ती त्याच्या आत होतीच हे लक्षात यायला त्यांच्या आयुष्याची अखेर आणि माझ्या आयुष्याचं मध्यंतर जवळ यावं लागलं.

-0-

- अण्णा जाऊन आता एक वर्ष होतं आहे. तेरा नोव्हेंबरची ती अतिशय गारठलेली पहाट होती. एका कष्टाळू रगदार जगण्याची आयुष्यासोबतची लढाई संपत आलीय, हे कळून आलं होतं. माझ्या डोळ्यांदेखत मी अण्णांना क्रमश: विझत जाताना पाहत होतो. जवळ एक तरुण रेसिडेंट डॉक्टर होता, तो त्यांचा इसीजी काढण्याचा प्रयत्न करत होता. फुफ्फुसातलं ऑक्सिजनचं प्रमाण आणि हृदयाच्या ठोक्यांची गती दाखवणारं एक मॉनिटर तिथे शेजारी ठेवलेलं आहे, त्यावरचे आकडे कमालीचे अस्थिर झाले आहेत. कधी ते चंचलपणे वर वर जाताना दिसतात, कधी झरझरझर खाली जाताना. नंतर हळूहळू ते खाली खाली खालीच जाताना दिसायला लागले आणि मग अवनत अवस्थेत स्थिर झाले. पंधरावीस दिवसांच्या सततच्या तापेने तांबडेभडक झालेले अण्णांचे डोळे अर्धवट उघडे आहेत. त्यांच्या मानेच्या बाजूची एक शीर मघापासून तडतडताना दिसत होती, ती हळूहळू शांत झाली आहे. त्यांचे डोळे, चेहरा, छाती मी खूप निरखून पाहत राहिलो. त्यांची छाती बंद पडली आहे.

डॉक्टरने इसीजीचं यंत्र बाजूला ठेवलं. मान हलवून शक्य तेवढं दु:ख चेह-यावर आणून तो म्हणाला, ते गेले आहेत. ही इज नो मोअर.

डॉक्टरला झोप अनावर होते आहे. एक सिस्टर, एक ब्रदर निर्विकारपणे काहीतरी इकडेतिकडे करत आहेत. वार्डातले बाकीचे पेशंट, त्यांचे सोबती घाबरून चिडीचूप झाले आहेत. गालांवरून अश्रू ओघळत असलेली माझी मोठी बहीण अण्णांच्या चेह-यावरून हात फिरवते आहे. रडता रडता तिने त्यांच्या डोळ्यांच्या अर्धवट उघड्या पापण्या बंद केल्या.

‘आपला बाप गेला’ म्हणजे आपलं नक्की काय हरवलं आहे, याचा अंदाज बांधत मी अण्णांच्या चेह-याकडे पाहत उभा आहे.

एकाएकी माझ्या लक्षात आलं की आणखी तासाभरानंतर हा चेहरा आपल्याला कधीही दिसणार नाहीय. ते रखरखीत हात आपल्या पाठीवरून यापुढे फिरणार नाहीयत. त्या रापलेल्या पावलांशी यापुढे कधीही मस्तक नमवता येणार नाहीय. आपला बाप आपल्या आयुष्यातून कायमचा निघून गेला आहे.

काळजात खोलवर काहीतरी तुटून गेल्याची भावना झाली आणि मग एकदम छाती फुटून मला उन्मळून रडू आलं.

आपला बाप गेला, त्याक्षणी, जगण्याच्या भुईत खोलवर रुतलेली आपली मुळं उखडली गेली आहेत, हे अगदी हळूहळू संथपणे आपल्या लक्षात येत जातं आणि आपण रोज कणाकणांनी अनाथ-अनाथ-अनाथ होत जातो. लाख वर्षांपासून वाहत आलेल्या जगण्याशी आपल्याला सांधून ठेवणारा एक दुवा कायमचा निखळला गेला आहे हे लक्षात येऊन निव्वळ अधांतरी सैरभैर हेलकावत राहतो आपण.

आपल्याला वाटतं, आपला बाप जायला नको होता.

बाप जातो तेव्हा माथ्यावरची खरोखर सावली जाते आपल्या. एका उर्दू शायरने लिहिले आहे की उनके होने से बख़्त होते हैं, बाप घर के दरख़्त होते हैं.

आत्ता आत्ता तुम्ही मला कळायला लागला होता, अण्णा! ‘बाप घर के दरख्त होते है..’ हे आत्ता आत्ता मला उमगायला लागलं होतं!

तुम्ही का गेलात, अण्णा?

--0--

- बालाजी सुतार.

(पूर्वप्रकाशित - 'अक्षरलिपी' दिवाळी अंक २०२२.)

Comments

  1. आज वाचलं, खरंच हे वाचायच राहून गेलं असतं तर ... खूप काही हरवलं असतं ... !

    सविस्तर whatsup वर बोलतो नंतर !

    ReplyDelete
  2. Lihayala shabda nahit. Far dukkhad hote sagale. Ashya vatavaranatun tu eka kamala sarakha ugavalas mhanato

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पळसाचं चौथं पान: नागराज मंजुळे

उत्तरार्ध